शुक्रवार, ८ जून, २०१२

वाडा आठवणींचा ( भाग- ८)

वाड्यात आमच्या बिल्डींग मधले इतर शेजारी होते लेले, दिवाण, भिडे आणि रामचंद्र व वसंत पळसुले हे बंधू. दिवाणांकडच्या एका घटनेने आम्हा भावंडांना नवीन काम लावून दिले. त्यांच्या प्रकाशचे लग्न होते, ते सगळे बाहेर गावी असताना रात्री त्यांचे घर फोडले, बराच ऐवज चोरीस गेला. ह्या चोरी नंतर वाड्यातले कोणीही घर बंद ठेवून गावाला निघाले की आम्हाला "सुपारी" द्यायचे. अहो "सुपारी" झोपायची, घर सांभाळायची. सुरुवातीला अण्णा जायचा. तो नोकरीला लागल्यावर मी जायला लागलो. असे जवळ जवळ सगळ्यांच्या घरात मी झोपलो आहे. ह्यात पण व्यक्ती तितक्या प्रकृती! काही जण सांगायचे, 'घरात फ्रीज मध्ये फळं आहेत, खा तुला हवी तर', काही जण फ्रीजला कुलूप लावायचे, असे बरेच अनुभव आले.

हनुमान स्टोअरवाले 'भिडे' हेही आमचे शेजारी, त्यावेळी हनुमान स्टोअर हे स्टेशनला लागून असलेले प्रसिद्ध दुकान होते. त्यांच्याकडे सगळ्या वस्तू मिळायच्या आणि अशी दुकानं डोंबिवलीत तेंव्हा फार थोडी होती. भिड्यांचा राजू फार तडतड्या होता, बाबांना खूप घाबरायचा. त्याने मस्ती केली की त्याचे बाबा त्याला उचलून दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून 'खाली टाकेन' म्हणून लटकवत धरायचे. राजूच्या आई खूप साध्या होत्या, त्यांना भिडे काका कायम अक्का (अक्काबाई) म्हणूनच बोलायचे.

वाड्याच्या गेट जवळ, एका छोट्या लाकडी खोपटात तारे काका रहायचे. वाकेन पण मोडणार नाही! अशा स्वभावाचा हा माणूस. ते सुतारकाम करायचे, परिस्थिती कठीण म्हणावी अशीच. त्यांचा घटस्फोट झाला असावा, ते वाड्यात आणि बायको अंबरनाथला रहायची. तारे काकांनी हट्टाने मुलींचा ताबा घेतला होता. पिंकी आणि मनी ह्या मुली, पिंकी माझ्या पेक्षा ५-६ वर्षांनी लहान आणि मनी त्याहून. तारे काकांना कसला ताठा होता माहित नाही, ते त्यांच्याच तोऱ्यात असायचे. बिचाऱ्या मुली! ना बालपण अनुभवता आले ना कधी त्यांचे लाड झाले. त्या शाळेतही गेल्या नाहीत, पण बहुदा घरी त्यांच्या त्या शिकत असाव्यात, त्यांना लिहिता वाचता यायचे. पिंकी अगदी लहान असल्यापासून घरातली सगळी काम करायची, आणि मनी तिला मदत करायची. परिस्थितीने दोघींना लहानपणीच खूप मोठं केलं होतं. दसरा दिवाळीलाही ना गोड धोड, ना नवीन कपडे, दया यायची आणि आम्हीच फराळाचे वगैरे द्यायचो. त्या दोघी आमच्याकडे टी.व्ही. बघायला यायच्या, त्याही घाबरत घाबरत, त्यांना तारे काकांनी खूप धाकात ठेवले होते. आम्ही काही खायला दिले तर भीतीने खूप आग्रह केला तर घ्यायच्या, पण खुश व्हायच्या. त्यांना इतर मुलां प्रमाणे कपडे, खेळणीच काय, मुलभूत असे शिक्षण, आईचे प्रेमही मिळाले नाही. त्यांची आई शिक्षिका होती, चार पाच वेळा त्यांना भेटायला आल्याचे बघितले होते. असे म्हणू नये, पण मुलींचे सुदैव ! पुढे तारे काका आजारी पडले आणि त्यातच गेले. मुलींचे दिवस फिरले, आई त्यांना आपल्याकडे घेऊन गेली. मुलींना शाळेत घातले, बहुदा पिंकी ने बाहेरून दहावी केली असावी. दोन तीन वर्षात तिचे लग्न झाल्याचे कळले.

अजून अशीच एक लक्षात राहिलेली व्यक्ती म्हणजे, सुरवातीच्या भागात उल्लेख केलेल्या मालकांच्या बंगल्याच्या जिन्याखालचा भाडेकरू 'मल्लू'. तो लक्षात आहे एका अजब घटनेमुळे. मंडळी, माणसाचं मरण कसं, कधी, कुठे येईल हे सांगता येत नाही, असं म्हणतात. अगदी ते ही अनुभवलं ह्या वाड्यात. झालं काय तर ह्या मल्लूची म्हातारी आई आली होती गावाहून, कन्नडहून. वाड्यात आमची बिल्डींग, मध्ये विहीर आणि पलीकडच्या बाजूला नारळाच्या झाडाचा पार होता. मल्लूची आई उन्हाला ह्या पारावर बसली होती. एका नारळाने तिचा घात केला, तो झाडावरून पडला तो बरोबर तिच्या डोक्यावर, आणि मल्लूची आई तिथल्या तिथे गेली. काय काय पाहिलंय? मालकांचा नोकर मोहन, त्याचे रोज दारू पिऊन बायकोशी भांडण, ह्या भांडणाला वैतागून एक दिवस तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले, आणि तशी पेटलेली जोर-जोरात ओरडत घरातून अंगणात धावत आली. सगळेच घाबरले, तिचा दीर कृष्णा आणि मोहन ने तिला पकडून विझवले. पुढे ती वाचली, मोहनचे पिणे ही थोडेफार कमी झाले. मुलं शिकली, नोकरी व्यवसायाला लागली.

मंडळी माझ्या सदराच्या ह्या सरत्या भागात काही गोष्टी नव्याने आठवत आहेत. विहिरीत गळ टाकायची मजा! वाड्यातल्या विहिरीत बादली पडली की हा गळ टाकून ती शोधायची. बरेचदा बादली गळाला लागयचीही. विहीरीचं पाणी खराब झालं म्हणून पंप लावून पूर्णपणे उपसलेलीही बघितली आहे, तेंव्हा विहिरीचे जिवंत झरे बघितले होते आम्ही भावंडांनी शेण गोळा करून घरा मागचे अंगण सारवले आहे. मालकांच्या काकी, त्यांचे काहीश्या आजाराने कायम उचक्या देणारे वयोवृद्ध काका, लेले आजी त्यांच्या घरात आलेले बुवा, वसंत काकांचे रमी आणि ब्रिजचे डाव त्यांच्या सौ. शीला वाहिनींचे भजनी मंडळ, आमच्या बरोबर वरती राहणारे पळसुले काका, त्यांचे अचानक जाणे, मुलाने कलेवराचेही काढलेले फोटो, वाड्यातले खूप जुने भाडेकरू अध्यापक, घर काम मागायला येणारी, शेवग्याच्या शेंगा विकणारी जंगली, मोहन खोबरे आणि आगरथडे ही कुटुंब सगळे काही आठवते आहे.

वाडा माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग तर आहेच पण त्याच बरोबरीने आमच्या मागची अंबिका बिल्डींग आणि त्यातले गुर्जर, आशा मावशी, बच्चा काका ह्यांचाही सहभाग मोठा आहे. खूप इच्छा असूनही जाणीवपूर्वक हे सदर मी वाड्यापुरतं मर्यादीत ठेवले आहे. ह्या "वाडा आठवणींचा" ने मला पुन्हा एकदा बालपणात नेले. साधारण तीस वर्षापूर्वीचा काळ, व्यक्ती मी आत्ता नव्याने अनुभवल्या. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या एका साधारण माणसाचे बालपण कागदावर उमटले. माझे मला समाधान मिळाले.

माझ्या या साप्ताहिक सदर लिहिण्याच्या प्रयत्नाला खूप जणांचा हातभार लागला. सौ ने त्रागा न करता लिहिण्यास फुरसत दिली, टंकलेखन केले, 'काही ही काय लिहिता' म्हणून पाय ओढले नाहीत. भावंडांनी, वाड्यातल्या काही शेजाऱ्यांनी खूप प्रोत्साहन दिले, काही आठवणी जाग्या करून दिल्या. मंडळाने माझे सदर प्रकाशित करण्याचा धोका पत्करला. विशेषतः कार्यकारी समितीतील सौ. दीपिका जोशी आणि सौ. स्मिता काळे ह्यांनी लेखनातील चुकून राहीलेल्या चुका दुरुस्त केल्या, वाचकांनी लेखी, फोनकरून, समक्ष भेटून प्रतिक्रिया दिल्या, प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे.

धन्यवाद!

(समाप्त)

मधुसूदन मुळीक
















४ टिप्पण्या: