शुक्रवार 1 जून 2012

वाडा आठवणींचा ( भाग-७)

मंडळी हल्ली आपण आपल्या आजू बाजूला कित्येक "कोषातली" कुटुंब बघतो. "कोषातली" म्हणजे, मी आणि माझं कुटुंब असे. स्वतःला आपल्याच कोषात गुरफटून घेतलेली. अशा लोकांनी स्वतःला आपल्याच कुटुंबातल्या तीन चार जणांमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं असतं. आनंद उपभोगायचा, दुख वाटून घ्यायचं तेही अगदी आपल्याच कुटुंबात. आजू बाजूचे कसे आहेत?, कोणाची विचारपूस करावी हे काहीही नाही. कधी कधी विचार येतो, ह्यांना असं वाटतं का? की आपल्याला कोणाचीच गरज नाही आणि कधी लागणारही नाही, की खरंच त्यांना कोणाची गरज लागतच नाही! कधी कोणाकडे भेटले की देखल्या देवा दंडवत, "काय कसे काय?" पण भरभरून बोलणं, मन मोकळं करणं, काही गोष्टी सांगणं, विचारणं, सल्ला देणं/ घेणं नाहीच. आपण बरं अन्आपलं घर बरं, अशी कुटुंब हल्ली सर्रास दिसतात. असेच एक कुटुंब आमच्या वाड्यातही होतं बरंका! पळसुलेंचे शेजारी, वेदक. कुटुंबमोठं असुनही ह्याचं वागणं कोषातलं. बघा हं त्यांच्याकडे कोण कोण होतं ! भाऊ, त्यांची पत्नी भाभी, भाऊंचे लहान बंधु भाई; (भाईंची पत्नी आम्हीवाड्यात रहायला जाण्यापूर्वी बरीच वर्षे आधी गेल्याचे समजले होते) ह्या दोघांची मुलं मीना, अशोक, वंदना, शोभा, रंजना, दीपक, साधना, विवेक, मिलिंद, विकास, मेधा. हा क्रम चुकला असण्याची दाट शक्यता आहे कारण, एकतर हे सगळे वेदक "कोषातले" होते त्यामुळे फार बोलणे, घरी येणे जाणे नसायचे. दुसरे म्हणजे ही सगळी भावंडं माझ्या पेक्षा खूप मोठी होती, मला ह्या सगळ्यांची नावं लक्षात राहिली याचेही काहींना नवल वाटेल. वेदकांचे भाऊ कडक शिस्तीचे होते. घरात एवढी मुलं पण घरात कोणी खेळतंय, दंगा मस्करी चालू आहे असं कधीच बघितलेले आठवत नाही. वाड्यातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, मुलं कधी कोणाशी खेळायला आली आहेत, गप्पा मारत आहेत, कध्धीच नाही. कोण कितवीत आहेत, काय शिकत आहेत, कुठे नोकरी करतात सगळेच गूढ, कोषातले असल्याने कोणी भानगडीतही पडायचे नाही. त्यातल्या त्यात मेधा,विकास आणि मिलिंद ही धाकटी भावंडं कधी कधी बघून हसायची, जुजबी बोलायची. कोणाच लग्न ठरलं, नोकरी लागली अशा गोड बातम्याही घराच्या बाहेर गेल्या नाहीत. त्या काळी एखादा मुलगा अमेरिकेत शिकायला जातो म्हटल्यावर कोण गाजा वाजा व्हावा, पण वेदकांचा विवेक अमेरिकेत जाऊन जुना झाल्यावर बातमी फुटली. वेदकांच्या एका गोष्टीची खबर सगळ्यांना लागायची आणि वाड्यातली सगळी मुलं जमा व्हायची ती म्हणजे कलही लावणे. त्यांच्याकडे नेमाने कलही वाला यायचा, घरातली पितळेची भांडी, ताटं, डबे बाहेर अंगणात अवतरायची आणि कलही लावून चकाचक व्हायची. नुसत्या आठवणीनेही कोळशाचा आणि नवसागराचा वास आता सुद्धा जसाच्या तसा आला नाकात! पुढे हे सगळे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत बंगला बांधून तिथे राहायला गेले, ते ही गुपचूप.

त्याकाळच्या वाडा संस्कृती मधले असे हे ‘कोषातले’ कुटुंब, कदाचित घरातल्या एवढ्या माणसांमुळे त्यांना बाहेरच्यांची कधी गरजच वाटली नसावी.

वाड्यातली सगळी कुटुंब तशी सुखवस्तू, मध्यम वर्गातली होती. भाटकरांचे कुटुंबही त्यातलेच. सुरेश, महेश,मंजू आणि अंजू ही त्यांची मुलं. भाटकर मामा रेल्वेत नोकरीला होते, त्यावेळी त्यांना काळजी वाटावी अशी होती ती केवळ त्यांची मुलगी अंजू. अंजूला सगळा वाडा "आवा" म्हणायचा. आवाला थोडंफार ऐकू यायचं पण बोलता यायचं नाही, ती मुकी होती. वाड्यातल्या सगळ्यांनी आवाला सांभाळून घेतले होते. तिची खाणा खुणांची भाषा लहाना थोरांना अवगत होती. आत्ता वाटतं, किती भाव,भावना, विचार असतात आपल्या मनांत, कसे व्यक्त करायचे एवढे सगळे शब्दांविना फक्त समोरच्याला कळतील अशा काही मोजक्या खाणाखुणांनी? तिनेही जमेल तेवढ्या भावना अशाच मांडल्या असतील, पण कित्येक भावना अव्यक्त राहिल्या असतील, कित्येकदा तिच्या हातवाऱ्यांकडे दुर्लक्षही केलं असेल. अशा कोंडलेल्या अवस्थेत, तिला घरात कोणी ओरडलं, फटकारलं की ती जोर जोरात भोकाड पसरून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरातून एकेका पायरीवर थबकत खाली उतरायची. अंगणात मधोमध उभी राहून मनसोक्त रडायची. मग आम्ही तिला विचारायचो काय झाले? कधी कधी सांगायची, कधी आमच्यावरही ओरडायची. आमच्या घरात नाहीतर ओट्यावर बसायची आणि शांत झाली की जायची परत घरात. तिला बोललेले (खुणांनी) सगळे कळायचे, ती मतिमंद नव्हती, काही वर्षे ती विशेष मुलांच्या शाळेतही जायची. गणवेश घालून शाळेत जातांना खूप ऐटीत मानेला , वेणीला झटका देत सगळ्यांच्या घराकडे, ‘आपल्याला कोणी बघतंय का?’ बघायची. शाळेत काही वस्तू केल्या की हौशीने आणून दाखवायची. आमच्या कडे रोज टी.व्ही. बघायला यायची. त्यावेळी भाटकर मामांना काळजी वाटावी अशी फक्त आवा होती असं मी आधी म्हणालो ते एवढ्यासाठी की पुढे पुढे त्यांच्या काळज्या वाढतच गेल्या.

साधरण काय होतं, आई वडील मुलांसाठी खूप कष्ट करतात, मुलांना काही कमी पडू नये म्हणून मन मारत दिवस काढतात. पुढे मुलं मोठी होऊन जमेल तेवढे शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागतात आणि कुटुंबाचे दिवस बदलतात, एखादं मूल अगदीच असामान्य निघाले तर दिवस फिरतातही. भाटकर मामांच्या बाबतीत घडले मात्र उलटेच, परिस्थिती बिघडतच गेली. कधी कधी देवही कसा एकाच कुटुंबाला वेठीस धरतो, नाही? सुरेश, महेश, मंजू ही वयाने अगदी एका मागोमाग, कोणीच फारसं शिकलं नाही. जेमतेम दहावी झाले असावेत. नंतर मोठा मुलगा सुरेश ह्याला कुठेतरी खाजगी नोकरी लागली. पैसा हातात आल्यावर सिगरेट दारूचे व्यसन लागले. कालांतराने व्यसनांपायी पगार कमी पडू लागला. घरात भांडणं तर रोजचीच झाली. हे सगळे बघून शेजारीपाजारी आपोआप दुरावले. सुरेश नंतर जुगारही खेळू लागला, अशातच त्याने नोकरीच्या ठिकाणी काही अफरातफर केली, पकडला गेला, कैद झाली. सुटून आल्यावर दारूच्या पूर्णपणे आधिन झाला आणि एक दिवस कीटक नाशक पिऊन सगळं संपवलं. हे सगळं होत असतांना एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे मंजूच लग्नं झालं. पण........ त्याच सुमारास भाटकर मामींना संधीवाताने ग्रासलं. त्यांचे सांधे आखडायला लागले, हालचाल करणे कठीण होऊ लागलं. खूप औषधोपचार केले पण कशाचाच गुण आला नाही, कशातरी पाय ओढत त्या चालायच्या,त्या एक एक पायरी उतरून शौचालयात यायच्या, पुढे पुढे तर त्या बसून जिना उतरायच्या, त्यांना बघून वाईट वाटायचं. सगळे भाटकर मामींच्या तब्येतीची काळजी करत असतांना, पुढचा धक्का ........ भाटकर मामा गेले. त्यांच्या जागेवर रेल्वेत महेशला नोकरी लागली. भाटकर मामींचा संधिवात वाढतच होता. त्या पाठीतही वाकल्या, चालणं जवळ जवळ बंदच झालं. महेश रेल्वेत स्थिरावला, लग्न केले.जरा बरे दिवस यावेत तर त्याचे, बायकोचे आणि भाटकर मामींचे एकमेकांशी पटेनासे झाले. रोज भांडणं, ह्या सततच्या भांडणामुळे महेश वेगळा राहू लागला. तरीही त्याचे आणि बायकोचे पटेना, शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. महेशने दुसरे लग्न केलं. परत ये रे माझ्या मागल्या... सद्य परिस्थिती फारच करुणास्पद आहे. मोठी मुलगी मंजू हिचे पती संसार अर्ध्यावर सोडून गेल्याचे कळले. भाटकर मामी स्वतः उठून बसू शकत नाहीत, अंथरुणाला खिळून आहेत. आवा आता थकली आहे, खूप अशक्त झाली आहे, तिचेही वय पन्नाशीला आलंय. महेश वेगळाच राहतो. घरातली आवक म्हणजे बहुदा भाटकर मामांचे निवृत्ती वेतनच असावी. ज्या आवाला लहानपणी आईने हटकलं असेल तीच आवा आई होऊन त्याचं सगळं करते आहे. आम्ही वाडा सोडून बरीच वर्षे झाली, पण घर अजूनही ठेवले आहे. वाड्यात हल्ली जेव्हा जातो, आवा नेहमीप्रमाणे बाल्कनीत उभी राहून शून्यात बघत असते. मला बघितल्यावर निरपेक्ष आनंदाने हसते, तिच्या भाषेत, कसा आहेस? बायको, मुलं कशी आहेत? विचारते. खूप वाईट वाटतं तिच्याकडे बघून, दया येते, पुढे हिचे काय होणार असेही वाटते. खूप इच्छा होते वरती जाऊन आवाला, भाटकर मामींना भेटायची पण खरं सांगायचे तर त्या भग्नावस्थेतल्या घरात जाऊन भाटकर मामींना बघण्याचे धाडस होत नाही.

ह्या भागात एवढेच, तशीही अक्षरं पाणावली आहेत आणि मति सुन्न झाली आहे.

(ह्या भागातील काही नांवे बदलली आहेत)


(क्रमशः)


मधुसूदन मुळीक 

शुक्रवार 25 मे 2012

वाडा आठवणींचा (भाग ६)

मंडळी…वाड्यातले सगळे भाडेकरू कित्येक वर्षे एकोप्याने राहत होते, आम्हीच सगळ्यात शेवटी आलेले कुटुंब. सगळ्यांच्यात छान घरोबा होता, प्रत्येक जण आपलं सुख दु:ख इतरांबरोबर वाटून घ्यायचा, मन मोकळं करायला हक्काची अशी आपली माणसं होती. सगळ्यांना सगळ्यांचे गुण-अवगुण, सवयी, खोड्या माहिती होत्या आणि त्याच्या त्या गुणा-अवगुणांसकट बाकीच्यांनी त्याला स्वीकारलेलं असायचं.


अहो कित्ती बारीक-सारीक सवयी माहिती झाल्या होत्या माहित आहे? तुम्ही म्हणाल काहीही लिहितात, पण खरंच हे ही अनुभवलंय ह्या वाड्यात. वाड्यात तळ आणि पहिल्या मजल्यावरच्या बिऱ्हाडांसाठी सामुदाईक शौचालयं होती. त्यामुळे कोण कधी, किती वेळा जातो? किती वेळ लावतो? कोणाच्या नंतर जायचे नाही, कोण येताना दिसलं की धावत जाऊन आधी नंबर लावायचा, ही गणितं पक्की होती, पण ह्या बाबतीतही कधी कधी सौजन्य दाखवायचे बरका! पहले आप ! पहले आप ! ......सहन होईस्तोवरच.

तर आता भेटूया आमच्या काही शेजाऱ्यांना, अशाच त्यांच्या गुणा-अवगुणांसकट (हे मी अतिशय आदराने लिहितो आहे, केवळ आठवणी म्हणून, तरीही कृपया गैरसमज नसावा.)

आमचे सख्खे शेजारी म्हणजे हर्डीकर, नाना आणि रेखाच्या आई (सगळे असेच संबोधायचे) आणि रेखा, अरुणा, नंदू ही त्यांची तीन मुलं. नाना काही वर्षे आर्मीत होते, त्यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानी सेनेत काम केले होते. आर्मीतून आल्यामुळे कडक शिस्त, स्वच्छता आणि टापटीपपणा नानांच्या अंगात मुरलेला. पांढरे शुभ्र कपडे घालून, लाकडी आराम खुर्चीत टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र वाचत, सिगरेट पीत बसलेले नाना अजूनही तसेच्या तसे डोळ्यासमोर येतात. रेखाच्या आई आणि नाना ह्यांनी व्यवसायात जम बसविण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. घरोघरी जाऊन तेल, साबण विकले, वेळप्रसंगी रद्दी विकून आलेल्या पैशावर वेळ निभावली. नानांनी तयार केलेलं "बडगा" हे ढेकणावरचं औषध अजूनही आठवतंय. त्याला प्रचंड दुर्गंधी होती, त्यामुळे खूप जालीम असूनही ते बाजारात खपलं नाही. ह्या बडग्याची मोठी चीनी मातीची बरणी मागच्या दारात पडून होती, आम्ही मुलं मुद्दामून तिचं झाकण उघडून वास घ्यायचो, अजूनही तो वास नाकात बसलाय. रेखाच्या आईंच्या साथीने नानांनी धंद्यात जम बसवला. ते पुण्याहून तिखट, हळद, श्रीखंडाच्या गोळ्या, मसाला सुपारी आणून मुंबई, ठाण्यातल्या दुकानदारांना पुरवायचे. जोडीला रेखाच्या आई घरी बायका ठेवून त्यांच्या कडून लोणचं मसाला, गोडा मसाला, उपवासाची, थालीपीठाची, चकलीची भाजणी करून घेऊन पुरवायच्या. संक्रांतीच्या मोसमात तिळगूळ बनवायच्या, आम्ही मुलं लाडू वळायला, पाकीटं भरायला जायचो आणि बदल्यात तिळगूळ खायचो. रेखाच्या आई हा व्याप सांभाळून विणकाम, भरतकामही उत्साहाने करायच्या.

रेखाच्या आई कधी कधी आम्हा मुलांना खूप त्रास द्यायच्या, ओरडायच्या. दुपारच्या वेळेत आम्ही अंगणात क्रिकेट, लगोरी, आबादुबी खेळत असतांना कधी कधी चेंडू त्यांच्या घरात जायचा. मग झालं चेंडू जप्त! द्यायच्याच नाहीत. एकदोनदा तर चेंडू विळीवर अर्धे चिरून बाहेर फेकले होते.

नानांना दम्याचा त्रास होता. पुढे जाऊन हृदयविकारही झाले, त्यात १९८१-८२ साली त्यांचे निधन झाले. रेखाच्या आई खूप कणखर आणि व्यवहारिक, व्यवसायात असणारा कर्ता पुरुष गेल्यावर कुठलीही साधारण स्त्री हतबल होऊन खचून गेली असती. पण त्यांनी मुलाला Apprenticeship साठी पुण्यात टेल्कोला ठेवले, पुढे तो तिथेच नोकरीस लागला. त्यांनी व्यवसायाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पुण्याहून माल आणण्यासाठी अमृत, बाळा पाटील, जोशी ही माणसं त्यांच्याकडे कामाला होती. त्यांच्या कडून माल आणून घेणे, ते परस्पर धंदा करत नाहीत ना ? ह्याची खबरदारी घेणे, त्यांच्या मार्फत पैश्याचे व्यवहार सांभाळणे, हे त्या काटेकोरपणे लक्षं ठेऊन करायच्या. घरी मसाले, भाजण्या तयार करण्यासाठी पत्की बाई, कल्पना, भावे आजी, आशा ह्या बायका यायच्या. मुलगा पुण्यात, दोन्ही मुली लग्नं झालेल्या आणि नोकरीला, त्या एकटीने सगळे सांभाळायच्या. आमचाही हात भार लागला त्यांना व्यवसायात. किराणा माल, गिरणी वाल्याने आणलेली पीठ, भाजण्या उतरवून घे, घरी येणाऱ्या गिऱ्हाइकाला माल दे, अशी बरीच कामं आमच्या घराने केली. आमची मोठी ताई रोज त्यांना सोबत म्हणून रात्री झोपायला जायची, तिचे लग्न झाल्यावर छोटी ताई जात असे. रेखाच्या आई स्वतः सगळा माल द्यायला ठाण्याला जायच्या त्याही सकाळी ९.२७ ची जलद लोकल पकडून, भर गर्दीच्या वेळी. एकदा अशीच लोकल पकडतांना त्या पडल्या आणि हात फ्रॅक्चर झाला पण त्यांनी हार काही मानली नाही, तात्पुरते माल टाकायला एका बाईला कामावर ठेवले, हात बरा होताच काम चालू. व्यवसायाचा व्याप सांभाळत, आपले छंद जोपासत, नोकरी करणाऱ्या मुलीच्या मुलालाही त्यांनी सांभाळले. त्यांचा दिनक्रम अगदी घडयाळाच्या ठोक्यावर, किंबहुना त्यांच्या कामानुसार घड्याळ लावले इतका वक्तशीरपणा. त्यांचे आणि मैत्रिणींचे रोजचे भेटायचे ठिकाण म्हणजे डोंबिवली स्थानकाचा जुना चार नंबरचा फलाट. रोज न चुकता म्हणजे अगदी पावसाळ्यात सुद्धा बरोबर संध्याकाळी सहा वाजता चार नंबरला, त्या आणि मैत्रिणी कोंडाळे करून बसलेल्या असायच्या. आम्हीही जायचो कधी कधी गाड्या बघायला. हे थोडी थोडकी नव्हे तब्बल वीस वर्षाहून जास्त, टी.सी.न्नाही हे माहिती होते, एवढ्या काळात कधीही त्यांना कोणी तिकीट विचारले नाही, नंतर नंतर गर्दी वाढली, वयानुसार सगळ्यांना झेपेनासं झालं, तेंव्हा हे मंडळ बंद झालं.

साधारण वयाच्या सत्तरी पर्यंत त्यांनी व्यवसाय केला. सगळे सांगायचे, रेखाच्या आई आता बंद करा धंदा, त्या म्हणायच्या, “होतं तोवर करत राहायचं”. त्यांनी स्वतः करता म्हातारपणाची पुंजी जमा केली, आपला उदरनिर्वाह व्यवस्थित होईल ह्याची खात्री झाल्यावर व्यवसाय बंद केला. त्यांची प्रचंड मेहनत, धीर, उत्साह आणि आत्मविश्वास बघून काहीजण त्यांना विचारायचे की तुम्ही कधीच रडत, कुढत, खचून गेलेल्या दिसला नाहीत? त्यावर त्या म्हणायच्या, मी माझ्या आजूबाजूला असे रडणारे, हतबल लोकं गोळाच होऊ दिले नाहीत, मैत्री केली तीही माझ्यासारख्या धडपड्या, आशावादी लोकांशी, संकटाला घाबरणाऱ्यांशी नाही. अजूनही वयाच्या पंच्याऐंशी – सत्याऐंशीव्या वर्षी स्वतः चे स्वतः करतात आणि गांधी वाड्यात त्या एकट्या राहतात.

आमचे दुसरे शेजारी "हाटे" त्यांना आम्ही हाटे मामा आणि हाटे मामी म्हणायचो. हाटे मामांना माझे भारी कौतुक, मला कायम माधवराव नावानेच बोलवायचे. मला हाटे मामींच्या हातची डाळींब्याची उसळ आवडायची, केली की त्या घरी द्यायच्या. त्यांच्याकडचा तूप, वरण भातही मला आवडायचा, लहान असताना मी त्यांच्याकडे जेवायचो. हाटे मामांच्या भावाच्या लग्नाला मी त्यांच्या बरोबर जाऊन राहिलो देखील होतो. हाटे मामा रेल्वेत नोकरीला होते, ते आणि हाटे मामी बरेचदा फर्स्ट क्लासने फिरायला जायचे, तेंव्हा त्याचे फार अप्रूप वाटायचे. ते दोघेही छान दिसायचे, हाटे मामी म्हणजे आशालता वाबगावकरच. आमच्या छोट्या ताईने केलेल्या बँकेच्या जाहिरातीत ते तिचे आई वडील दाखविले होते. प्रदीप, विनोदिनी आणि राजू ही हाटेमामांची मुलं. सगळेजण आपापल्या नोकरी संसारात स्थिरावले. नंतर डोंबिवली जिमखान्याजवळ बंगला बांधून हाटे कुटुंबीय तिथे राहण्यास गेले. प्रदीप पुढे राजकारणात जाऊन महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्षही होता.

आमच्या वाड्यात तीन पळसुले बंधू राहायचे, रामचंद्र, वसंत आणि अनंत. त्यातले एक अण्णा, सगळेजण त्यांना अण्णाच म्हणायचे. अण्णा आणि आशा वहिनी. आशा वहिनी आम्हा मुलांचे छान छान कार्यक्रम बसवायच्या. आंब्याच्या मोसमात आमरस पोळीचे जेवण, मुलांचे स्नेह संमेलन, वाडा साफ सफाईची मोहीम म्हणजे अगदी झाडू मारून, ह्या त्यांच्याच कल्पना. त्यांचे घरही मोठे होते, तिथेच आमचे स्नेहसंमेलन झाले होते. त्यांची सगळ्यात मोठी मुलगी उज्वला, प्रीती सागरचे "माय हार्ट इज बीटिंग" हे गाणं स्टाईल मध्ये म्हणायची, त्यातल्या इंग्रजीमुळे वाड्यातली मुलं एकदम भारावून जायची. त्या काळात टेलीविजन देखील दूर्मिळ असतांना अण्णांनी प्रोजेक्टर आणून वाड्यातल्यांना घरातल्या भिंतीवर चित्रपट दाखविला होता. आशा वहिनींकडे मुलं रमायची, त्या आमच्या बरोबर पत्ते खेळायच्या, पेटी वाजवून गाणी म्हणायच्या. अण्णा, आशावहिनी दोघांनाही पर्यटनाची खूप आवड, बहुतेक त्यांचे संपूर्ण भारत भ्रमण झाले असावे. आम्हा मुलां साठी अजूनही एक आकर्षण असायचं ते म्हणजे, त्यांनी जगन्नाथपुरीहून आणलेलं छोटसं पोपटाचं पिल्लू. हे पिल्लू पुढे खूप मोठं झालं आणि मस्त बोलायचं. ह्या दोघांची खासियत म्हणजे, नायलॉन च्या जाळीची मच्छरदाणी. सुरवातीला डोंबिवलीत अशी मच्छरदाणी शिवणारे ते एकमेव होते. अण्णा नोकरीला जी.पी.ओ. त (पोस्टात) होते, ते ऑफिसहून आले की शिवणकामही करायचे. अण्णांची अजून एक सवय म्हणजे, ते स्वतः रोज पहाटे दूध आणि पेपर आणायचे, पट्ट्या पट्ट्याचा लेंगा आणि बाह्यांचे बनियन असे ते डेअरीतून दूध घ्यायचे, हातात कोपराला पिशवी अडकवायची मग नाक्यावर वृत्तपत्र घ्यायचे आणि ते पूर्ण उघडून दोन्ही हातात धरून रस्त्याने वाचत घरापर्यंत यायचे. पेपरच्या पलीकडे रस्त्यावरचे काहीही दिसायचे नाही आणि त्यांना चिंताही नसायची, तेंव्हा रहदारी नसायची आणि लोकांनाही अण्णांची सवय माहिती झाली होती. जसे जसे पुढे गर्दी वाढली, सोसायट्या आल्या तसा तसा अण्णांच्या पेहेरावात आणि सवयीत फरक पडला. पांढरा लेंगा, शर्ट, दुधाची किटली असं होत होत मध्यंतरी शर्ट, पँट घातलेले अण्णा कापडी पिशवीतून प्लास्टिकची दुधाची पिशवी घेऊन, घडी केलेला पेपर न वाचता नेतांना दिसले.

तर मंडळी पुढच्या भागात भेटूया अजून काही शेजाऱ्यांना आणि आठवणीतल्या वाडयाला.

(क्रमशः)



 मधुसूदन मुळीक


शुक्रवार 18 मे 2012

वाडा आठवणींचा (भाग ५)


 मंडळी असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हल्लीच हे जाणवलं. ओम, आमचा मुलगा काहीतरी खेळणे बनवत होता, म्हणजे त्याचे त्याचे उद्योग चालू होते. आम्ही दोघेही त्याला ओरडलो आणि अभ्यासाला बसविले. थोडा विचार केल्यावर वाटलं, इतिहासाची पुनरावृत्तीच तर होती ती… पण आता त्याकडे बघणारे बदलले आहेत. बदललेल्या शैक्षणिक पद्धती, जीवनशैली सगळ्याच क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धा ह्यामुळे मुलांना शिक्षण आणि पालकांनी स्वतःच्या इच्छापूर्ती साठी लावलेल्या विविध शिकवण्या ह्यातून स्वतःचे उद्योग करायला वेळच मिळत नाही. ह्या प्रसंगाने आमचे सारे "उद्योग" आठवले, तर ह्या भागात आमच्या "उद्योगांबद्दल" म्हणजे खऱ्या आणि उपरोधात्मक दोन्ही अर्थाने.

खरे तर आम्ही विदर्भातले, शेगाव जवळच्या खामगावचे. आमचे वडिल त्यांच्या तरुणपणी, म्हणजे विशीच्या आतच डोंबिवलीत आले, एकटेच, इथे कोणीही नातेवाईक, मित्र नसतांना. त्यांनी सुरुवातीला अगदी दुकानांतही काम केले. नंतर मध्य रेल्वे, नॅशनल रेओन असं करत बी.ए.एस.एफ. ह्या जर्मन कंपनीत नोकरी करत होते. नुसती नोकरी करूनही ते व्यवस्थित राहू शकले असते, पण उद्यमशील स्वभाव. त्यामुळे त्यांनी शिफ्टची नोकरी सांभाळून प्लंबिंगचा व्यवसाय केला. ते डोंबिवलीतील सुरवातीच्या मोजक्या लायसनस्ड प्लंबर्स पैकी एक. आमचं बाजीप्रभू चौकात अगदी मोक्याचं दुकान होतं, ते बरेच वर्षांनी मालकांना परत द्यावे लागले. आमची आईही फार उद्योगी. फावल्या वेळात शांत बसणं, दुपारचं झोपणं असं कधीच नाही. आम्ही लहान असतानाही सगळं आवरले की आई पाण्याची मीटर्स दुरुस्त करायची. पाण्याची मीटर दुरुस्त करणारी आमची आई ही बहुदा एकमेव महिला असावी. आमचाही हातभार लागायचा ह्या मीटर दुरुस्तीला. मीटर पूर्ण नीट झालं की त्याचे सगळे काटे / नंबर शून्यावर आणावे लागायचे. आम्ही ती छोटी छोटी चक्र फिरवून ते शून्यावर आणायचो. दुरुस्त केलेली मीटर्स गिऱ्हाईकाला देण्यापूर्वी कुर्ल्याहून प्रमाणित करून आणावी लागायची. वडिलांना वेळ नसला की अण्णा (मोठा भाऊ) हे काम करायचा. वडिलांनी ह्या व्यवसायाबरोबर जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय केला आणि जागेत गुंतवणूकही केली. डी एन सी शाळे जवळच्या आमच्या जागेवर १९७५ साली त्यांनी एक बिल्डिंगही बांधून घेतली. डोंबिवलीचा हा भाग तेंव्हा लांब वाटायचा त्यामुळे आम्ही तिकडे न राहता ह्या "मुळीक बिल्डींग" मध्ये सहा भाडेकरू ठेवले. म्हणजे बघा, आम्ही मालक, राहात होतो भाड्याच्या घरात. नंतर नंतर प्लंबिंग कमी करून वडिलांनी शेअर मार्केट मध्ये चांगली गुंतवणूक केली. शेअर्स बद्दल सल्ला घ्यायला वडिलांचे बरेच मित्र घरी यायचे. आमची आई अजूनही शेअर्स मध्ये उलाढाल करते बरं का!

आमच्या आईने फक्त मीटर नाही दुरुस्त केली, ती क्लासला जाऊन शिवण शिकली, आणि अजून पर्यंत शिवणाची कामं करते. पूर्वी खूप शिवायची, कॉटन साड्यांच्या गोधड्या ही तिची खासियत. आता सांगून सांगून शिवणकाम कमी केलंय, अगदी ओळखीच्यांचेच शिवते. वाड्यातला माहोलच वेगळा असायचा. कोणीतरी काहीतरी शिकून /बघून यायचं आणि झालं, सगळ्या महिला दुपारी त्याच्या मागे. असे करत करत छंदाचे रुपांतर व्यवसायात व्हायचे. आमच्या आईने मण्याचे प्राणी, पक्षी, फळं, वेल्वेटची फुलं, फूलवाती, नायलॉनच्या दोऱ्याच्या पिशव्या, बटवे, लोकरीची तोरणं, क्रोशाचे टेबल क्लोथ, प्लास्टिक वायरच्या रिंगचे पडदे अशा कित्येक वस्तू करून विकल्या आहेत. घराच्या मागेच गणपती मंदिर, आजी तिथे कीर्तनाला जायची, आईने शिवलेली तिची चंची बघून आजीच्या मैत्रिणी चंची शिवायला यायच्या. शेजारच्या मैत्रिणी सोबत आईने लसूण चटणी आणि अनारशाचे पीठही करून विकले आहे. आमच्या घरच्या उद्योगांना दूधवाल्याचाही हातभार लागला. आमचा भय्या अगदी ताजं, शुद्ध दूध घालायचा, त्यामुळे घरात भरपूर साय, सायीचं दही आणि दह्याच लोणी व्हायचं (हे इतक्या सखोल सांगण्याचं कारण नव्या पिढीला लोणी आणि तूप घरी बनवता येतं हे बहुदा माहित नसावं) लोणी आणि तूप घरात खाऊन उरायचं, मग करायचं काय? आम्ही लोणीही विकायचो, अगदी शुद्ध आणि बाजारभावापेक्षा बरेच स्वस्त. अगदी ठरलेली गिऱ्हाईकं होती. बहुतेक भय्याला कळलं असावं, दीड दोन वर्षांनी त्याच्या दूधाची प्रत बिघडली. ती जुनी गिऱ्हाईकं भेटली की विचारतात, अजूनही लोणी देता का? हल्ली कुठे तसे दूध, आता मिळते ते भेसळयुक्त, दोन दिवसांपूर्वी पाकीटबंद केलेले दूध. आईच्या सगळ्या उद्योगात आमचाही खारीचा वाटा असायचा. वेल्वेटला फेविकोल लावून दे, पाकळ्या कांप, तारा चिकटव, वायरच्या रींग बनव अशी कामं आम्ही करायचो. ह्यात, तू मुलगा आहेस, हे करू नको असं कधी झालं नाही, ह्यामुळे आम्ही बरेच शिकलो.

आमच्या भावंडांचे उद्योग म्हणाल तर आम्ही तसे फार व्रात्य नव्हतो त्यामुळे फार काही नाहीत. डोंबिवलीत दातारांची श्री लाँड्री प्रसिद्ध आहे, त्यांच्या काही शाखा आहेत. एका होळीला अण्णाने वाड्यातल्या मित्रांबरोबर जाऊन त्यांच्या भय्याची लाकडी खाट उचलून आणून होळीत टाकली. झालं... भय्याला कळल्यावर तो आरडा ओरडा करत वाड्यात, पण तोवर ती जळून खाक झाली होती. थोड्याफार भांडणानंतर सगळं शांत झालं. असं आत्ता झालं असतं तर? सगळ्या वाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज बनवून, चर्चेच गुऱ्हाळं मांडून, मोठ्ठं राजकारण माजवलं असतं. आमचा अण्णा धाडसी, वडिलांची राजदूत मोटारसायकल तो सातवीत आठवीत असतांना चालवायचा आणि रस्त्याने लोक बघत राहायचे. त्याचा अजून एक उद्योग म्हणजे मासे पाळणे. आमच्या छोट्याश्या घरात एवढ्या माणसांसोबत फिशपाँडही होता. मासे पाळायचे, पाँड विहिरीवर जाऊन धुवायचा, माश्यांनी पिल्लं घातली की वेगळी काढायची, त्याला ह्या सगळ्याची खूप आवड होती.

त्याचे अजून एक आवडते काम म्हणजे विहिरीत मुटका मारायचे. तो मुटका मारायला गेला की सगळे जमा व्हायचे, मुटका म्हणजे मांडी घालून उडी मारून पाण्यात पाठीवर पडायचे. मुटका बरोबर बसला की खूप पाणी उडायचे. अण्णा शाखेतही जायचा, रामजन्मभूमी साठी तो अयोद्धेलाही गेला होता. त्यांना मधेच एका शासकीय विश्राम गृहात स्थानबद्ध करून ठेवले होते. नंतर काही दिवसांनी जबरदस्तीने गाडीत चढवून परत पाठविले होते. त्यावेळी आम्ही सगळेच तणावाखाली होतो.

आमची मोठी ताई उद्योगी नव्हती, ती खऱ्या अर्थाने ताई होती. तिने कॉलेज मध्ये असतांना जनगणनेचा उद्योग केला आणि मग ठिक-ठिकाणच्या पाण्यामुळे बरीच आजारी पडली होती. आमची छोटी ताई म्हणजे माझ्याहून मोठी पण मोठ्या ताईहून छोटी बहिण, ही फार उद्योगी. ती वाड्यातली एकमेव मुलगी असेल जी मालकांच्या बंगल्याच्या रहाटावरून (साधारण दुसऱ्या मजल्यावरून) विहिरीत उडी मारायची. तिला चित्रकला, शिवण, पाककला ह्याची खूप आवड आहे. कॉलेज मध्ये असतानाच ती पंजाबी, बंगाली, चायनीज असे पदार्थ शिकली आणि घरी त्याचे क्लास सुरु केले. लग्नाची मेहेंदी, मेकप करायला जायची. अण्णाला फोटोग्राफीची आवड होती म्हणून एक एस एल आर कॅमेरा घेतला होता, ताई त्याने लग्नाचे फोटो काढायला जायची. पाककलेची हौस त्यामुळे काही जणांना खाद्यपदार्थही पुरविले होते.

माझे "उद्योग" म्हणाल तर, दोन प्रसंग अजूनही जसेच्या तसे डोळ्यापुढे येतात.

आमच्या वाड्यासमोर रस्त्याच्या पलीकडे माटेवाडा होता, त्याच्या शौचालयांची मागची बाजू रस्त्याच्या बाजूला यायची. एकदा आम्ही मुलांनी बेचकी तयार केली आणि स्पर्धा लावली, माटेवाड्याच्या शौचालयाच्या खिडकीतून दगड आत मारायचा. मी एक-दोन दगड बरोबर नेम धरून आत मारले आणि झालं. लाल्या (जे आमच्याहून बरेच मोठे होते, पण सगळे त्यांना लाल्या म्हणायचे) आरडा ओरडा करत आमच्या मागे धावत. काय झालं हे कळलं आणि पुढे काय होणार हे ही! जे रस्त्यावर धावत सुटलो. आमच्याकडे तेव्हा आत्या आणि आत्तेभावंडं आली होती, आत्तेभाऊ संजू माझ्या मागे आणि मी पुढे असे बराच वेळ रस्त्यावर धावत होतो. शेवटी त्याने मला पकडून घरी आणलं आणि मग मस्त...............

दुसरा उद्योग, अगदी सगळ्यांच्याच लक्षात राहिलेला. मी आठवी नववीत असेन, मे महिना होता. झाडाला खूप कैऱ्या लागल्या होत्या. बरोबर झाडाखाली, विहीरीवरच्या मोरीचा सिमेंटचा पत्रा होता, बिल्डींगच्या जिन्यावरून ह्या पत्र्यावर चढता यायचे. आम्ही सगळी मुलं पत्र्याच्या आवाजाकडे कान लावून असायचो. धप्प..............आवाज झाला आणि मी सुसाट जिन्यावर, तिथून पत्र्यावर आणि...............धाड धाड धाड........ पुढचं मला बघ्यांकडून नंतर समजले. मी पत्रा तोडून, पत्र्यावरचा कचरा आणि पालापाचोळा पांघरून पडलो होतो मोरीवरच्या कपडे धुवायच्या मोठ्ठ्या दगडाच्या अगदी बाजूला, थोडक्यात बचावलो होतो. सगळा वाडा मधु पडला ! मधु पडला ! म्हणून गोळा झाला, मला आत उचलून नेले. काही वेळाने मी भानावर आलो.

अशीच एक आठवण म्हणजे बाजूच्या वाड्यात सगळ्या मुलांची, आशा मावशी रहायची, तिने आम्हा मुलांना चित्रकला शिकवली, ती स्वतः कला महाविद्यालयाची चित्रकार आहे आणि तेंव्हा ती शिक्षिका होती. आम्ही मुलं केवळ तिच्या मुळे एलिमेंटरी आणि इंटरमिजीयेट परीक्षा पास झालो. तिने शिवलीलामृताच्या पारायणाचे व्रत केले होते. मी असेन सातवीत वगैरे, न चुकता सगळ्यांबरोबर त्याचे पारायण केले, मला फार काही कळत नव्हते, पण चिल्या बाळाची गोष्ट ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावायचे.

मी सातवीत असतांना आमच्या स.वा.जोशी विद्यालयाची सहल राजस्थानला गेली होती. जयपूरला आम्ही युथ होस्टेलमध्ये उतरलो होतो. त्या वयात परदेशी गोऱ्यांचे फार आकर्षण होते. आम्ही उतरलेल्या हॉटेल मध्ये आम्हाला एक गोरा भेटला, तो आमच्याशी बोलू

पाहत होता. वासरात लंगडी गाय........सगळे इंग्रजीत बोलायला लाजत होते, कोणीच पुढे होत नव्हते. मग मी जाऊन त्याच्याशी बोललो. त्याचे नाव, पत्ता लिहून घेतला, बरोबर फोटो काढले. मग काय वट....कॉलरताठ. घरी पोहोचल्यावर खास परदेशी पाठवायचे पत्र (ग्रीनलंड) आणून त्याला पत्र पाठविले. काही दिवसांनी परदेशी टपाल तिकिटे असलेले पाकीट आले, वर नाव होते "दानिएल एबरहार्द". बापरे.......केवढा आनंद! नुसता जल्लोष! मागच्या वाड्यातल्या, सहलीला बरोबर आलेल्यांना जोर जोरात हाका, अतुल......., अनघा........ दनिएलच पत्र आलं ! ही पत्रमैत्रि एक-दोन वर्ष चालली. हा इसम शिक्षक होता आणि जगभर फिरस्ती करायचा. हल्ली…आठवण आल्यावर फेसबुकला शोधलं पण शोध काही लागला नाही.

आमच्या छोट्या ताईने आणि मी केलेला अजून एक उद्योग म्हणजे मॉडेलिंग, आम्ही दोघांनीही काही जाहिराती केल्या. ताई होती क्यॅनरा की महाराष्ट्र बँकेच्या जाहिरातीत आणि मी औषधाच्या दोन तीन जाहिराती केल्या. आमच्या मालकांचा मुलगा श्री अनिल गांधी हे ह्या व्यवसायात आहेत, त्यांनीच आम्हाला ब्रेक दिला. मला आठवतंय... जाहिरातीच्या पैशातून मला पहिली फुल प्यैंट आणि फुल शर्ट घेतले होते.

छोट्या ताईने आणि मी बटिक, बांधणीची कापडं तयार केली होती. बहिणीने त्याचे ड्रेस शिवले, तिच्या शिवणकामाचा फायदा तिला तिच्या ड्रेपरीच्या व्यवसायात होतोय. तिने तिचे उद्योग खऱ्या अर्थाने चालू ठेवले आहेत, डोंबिवलीत तिचे नावारूपाला आलेले दुकान आहे.

तर असे हे आमचे उद्योगाचे बाळकडू आणि "उद्योग", ह्यामुळे कामाशिवाय नुसते बसणे, दुपारची वामकुक्षी, चित्रपटगृहात जाऊन तीन तीन तास पडद्यासमोर घालवणे हे कधी जमलेच नाही. आई वडिलांचे कष्ट बघून एक जाणीव झाली की त्यांनी शून्यातून सुरु करून काही वर्षात एवढं मिळवलं तर आपणही जे मिळाले ते शून्य समजुन पुढचा टप्पा गाठायला हवा.

 मधुसूदन मुळीक



मंगळवार 15 मे 2012

सोमवार 14 मे 2012