मंगळवार, २७ मार्च, २०१२

रेझोनन्स

नेहमी सारखाच आज एक दिवस. आठवड्याच्या सुट्टीचा दिवस असल्याने जरा निवांत. दिनक्रमानुसार आता संध्याकाळी फिरायला बाहेर पडलोय.

घरातून बाहेर पडल्यावर दोन मिनिटात गल्फ रोड. हा हायवे क्रॉस केला कि पाच मिनिटात समुद्र किनारी पोहोचतो.
आज छान हवा आहे. नेहमीचा दमटपणा हवेत नाहीय. तासाभराचा फेरफटका मारल्यावरही फारसा घाम नाही कि थकवा नाही. आपल चालण आज लवकर आटोपलं अस काहीस वाटल. थोडावेळ बसायचा मोह झाला.
एव्हाना अंधार पडला होता. झुळझुळ वारं सुटल होतं. समुद्र तलावासारखा शांत पसरला होता. झिलमील झिलमील वाऱ्याच्या लहरी आणि त्यात लवलवणारी स्ट्रीटलाईट्सची प्रतिबिंब. पलीकडच्या बेटावरचे लुकलुकणारे दिवे.

का कोण जाणे मला परवा दूरदर्शनवर पाहिलेली एक मुलाखत आठवली. मुलाखत होती एका प्रसिद्ध शास्त्रीय संगीत तज्ञाची. जेव्हा मुलाखतकाराने त्यांना एखाद्या अविस्मरणीय घटनेबद्दल सांगाल का असे विचारले, त्यांनी सवाई गंधर्व महोत्सवातील पंडित मल्लीकार्जुनांच्या एका मैफलीबद्दल सांगितले. तीनचार तास चाललेल्या त्या मैफलीतील चार पाच मिनिटे अशी होती कि पंडितजींचे गाणे, तंबोरा, आणि श्रोते सर्व काही एक झाले होते. अवघं वातावरण एक सूर झाले होते.

त्यानंतर आठवला तो भौतिकशास्त्रातला कधीतरी अभ्यासलेला रेझोनन्सचा सिद्धांत...

निसर्ग, संगीताची मैफल आणि आयुष्य... या तिघात या बाबतीत साम्य आहे असे वाटते.
समुद्र किनाऱ्यावरचा नेहमीचा कोलाहल... आणि कधी कधी अनुभवला येणारा आजच्यासारखा आल्हाददायक निसर्ग...

चार तासांच्या मैफलीत बऱ्याच परिश्रमानंतर कधीतरी लागणारा स्वर्गीय स्वर...
आयुष्यही तसेच... उतार चढाव, खाच खळगे, दमछाक आणि कधी कधी क्वचितच साधणारा रेझोनन्स...
वाटते... आयुष्यभर असा रेझोनन्स साधता आला तर?

तर खास प्रयत्न करून गात्र शिथिल सोडत दीर्घ श्वास घ्यायची कधी गरजच पडली नसती...!


दिलीप सावंत

२ टिप्पण्या: