रविवार, ३ एप्रिल, २०११

स्वप्नपूर्ती विश्वचषकाची



आपल्या सचिनचं स्वप्नं पूर्ण झालं.  १२१ कोटी भारतीयांची मनं जिंकली भारताच्या क्रिकेट टीमनं !! ११ जणांची टीम वानखेडे स्टेडीयम वर खेळत होती पण अख्खी भारतीय जनता त्यांच्यासोबत खेळत होती.  मॅच बघतांनाही तेच स्पिरीट होतं.  आम्ही कुवेतमधे असून सुद्धा त्याच उत्साहात, त्याच जल्लोषात भारताचा विजय साजरा केला.
मॅचची सुरवात झाली तेव्हापासून जवळजवळ ४५ ओव्हर्स होईस्तोवर मॅच आपल्या ताब्यात होती.  पण शेवटचे पाच ओव्हर्स झाल्यानंतर मात्र मनात शंकेची पाल चुकचुकायला सुरवात झाली.  मधला Interval खूपशा अस्वस्थतेतच गेला.  मग आपली बॅटींग ! दुसर्‍याच बॉलवर गेलेली सेहवागची विकेट……लंकेचा जल्लोष…..आई गं…..!! नकारात्मक विचार अजिबातच मनात येऊ द्यायचे नाही असं ठरवलं होतं.   मग आपल्या सचिनची विकेट..झालं……. !! आता मात्र  धीर सुटत चालला.  पण आपल्या फलंदाजांवरचा विश्वासही बळकट होता.  मग विराट…..गंभीर आणि धोनी……!! धोनीचं जबरदस्त आत्मविश्वासाने ग्राऊंडवर येणं बरंच काही सांगत होतं.  दुसर्‍या बाजूने गंभीरही खंबीर होता.  पहिल्यापासून शेवटपर्यंत रनरेट अगदी maintained होता.
मॅच एकेक ओव्हर पुढे सरकत होती.  श्वास काही केल्या नॉर्मल वर येत नव्हता.  धडधड इतकी वाढली होती की ती चक्क स्वत:ला ऐकूही येत होती.  पण धोनी आणि गंभीर मात्र अगदी शांतपणे खेळत होते.  कशाचीच पर्वा न करता त्यांची वाटचाल सुरु होती.  धोनीच्या चेहेर्‍यावर मात्र थकवा जाणवत होता.  मधेच त्याला क्रॅम्प पण आली पाठीत.  सगळ्यांचे चेहेरे विचारमग्न होते.  पण तो जिद्दीने उठला.  गंभीरची शतकाकडे वाटचाल सुरुच होती.  आता फक्त ३ धावा..! त्याला धीर धरवेना…….समोर येऊन फटका मारायला गेला पण त्या अगदीच सुमार चेंडूने त्याला चकवलं आणि विश्वकप मधलं त्याचं पहिलं शतक हुकलं !! सगळे लोक हळहळले !! क्रिकेट…….एक क्रूर खेळ !!
मग आला युवी !! जबरदस्त फ़ॉर्म पुन्हा मिळवलेला युवी आणि Super Cool कॅप्टन धोनी !! विजयाच्या उंबरठ्याशी आणलं भारताला…..!! आणि मग तो स्टायलिश षट्‌कार…………!! केवळ अप्रतिम !!  त्या एका षटकारानं २८ वर्षांनी पुन्हा भारतानं विश्वचषक जिंकला !!  संगकारा आणि लंकेच्या खेळाडूंचे हताश चेहरे बघवत नव्हते.  ते पण जबरदस्त खेळले होते पण विजयाची माळ मात्र भारताच्या गळ्यात पडली होती.
आपण जिंकलो……. जिंकलो????? येस…………जिंकलो….याहूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ !!
आणि मग जो काय जल्लोष सुरु झाला तो शब्दातीत होता !! सचिनला, गॅरी कर्स्टनला खांद्यावरुन मिरवणं, युवीचं सचिनला घट्ट मिठी मारुन रडणं, भज्जीचं भावनाप्रधान होणं…सगळं सगळं प्रत्येक भारतीय अनिमिष नजरेनं साठवून घेत होता.  त्यानंतरच्या प्रत्येकाच्या मुलाखती !! ते सचिनच्या स्वप्नाचं पूर्ण होणं…… सगळंच स्वप्नवत्‌ होतं.
भारतात तर जल्लोष होताच. पण इथे कुवेतमधेही सगळे रस्त्यावर आले………नाचले, फटाके उडवले……!! एकमेकांना फोनवरुन अभिनंदनाचा वर्षाव !! सगळं वातावरण अगदी भारलेलं !! सचिनचा आनंद तर ओसंडून वाहत होता.  तो क्षण संपूच नये असं वाटत होतं !  अजून काही दिवस हा भर असाच राहणार !! खेळाडूंवर बक्षिसांची खैरात करण्यात आली.  No doubt, They deserve it !!
महेंद्र सिंग धोनी….. भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन !! T-20 चं विजेतेपद, कसोटीतलं पहिलं मानांकन,  आता हा विश्वचषक आणि त्याबरोबरच One Day मधलंही पहिलं मानांकन……. !! अवघं क्रिकेट विश्व त्याने आणि त्याच्या टीमने आपल्या पायाशी झुकवलं !!  एक कडक सॅल्यूट धोनी आणि त्याच्या वीरांना !!
भारतीय टीमला या दणदणीत  विजयासाठी मनापासून शुभेच्छा !!
एक मात्र नक्की जाणवलं !! भारतातले विविध धर्मी लोक सगळा भेदभाव विसरुन क्रिकेटसाठी मात्र एकरुप होतात !! हा खरं तर क्रिकेट ह्या खेळाचा विजय आहे !!
Three Cheers for Indian Cricket Team……Hip Hip Hurray……Hip Hip Hurray……. Hip Hip Hurray………..!!












जयश्री अंबासकर

३ टिप्पण्या: